महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात गैरकारभार; सरकारी शाळेतील विद्यार्थी बेकायदेशीर अकॅडमीत, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागात गंभीर गैरकारभार सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केला आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नावनोंदणी करायची आणि प्रत्यक्षात त्यांना बेकायदेशीर खाजगी अकॅडमींना पुरवठा करायचा, असा धक्कादायक प्रकार शिक्षण विभागाच्या पाठिंब्याने सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून, येत्या शैक्षणिक वर्षात ही पद्धत बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचा समृद्ध वारसा या जिल्ह्याला दिला आहे. मात्र, शिक्षण विभाग आता कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करत आहे. विद्यार्थ्यांची नावे सरकारी शाळेत ठेवली जातात, परंतु ते प्रत्यक्षात खाजगी अकॅडमीमध्ये शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असताना, शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने या नियमाला बगल दिली जात आहे. केवळ परीक्षेसाठी विद्यार्थी शाळेत येतात आणि वर्षभर त्यांची खोटी हजेरी नोंदवली जाते. शाळा तपासणी केवळ कागदोपत्री प्रोटोकॉल पूर्ण करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे.
जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक असतानाही, शिक्षण विभागातील काही प्रमुख व्यक्तींच्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थीही आता अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरत आहेत, ज्याचा वार्षिक खर्च लाख ते दीड लाख रुपये असतो. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये पालकांचे वाया जात आहेत. बेकायदेशीर अकॅडमीमध्ये विद्यार्थी निवासी असतानाही शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही, असा सवालही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिल्ह्यात एकूण किती बेकायदेशीर अकॅडमी आहेत आणि किती विद्यार्थी अशा ठिकाणी शिक्षण घेत आहेत, याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, खोट्या तपासणी आणि हजेरी नोंद करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शिक्षण विभागातील किती अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या नावे अशा अकॅडमी चालवल्या जातात, याचीही चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीत आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात जर एकाही सरकारी शाळेतील विद्यार्थी अनधिकृतपणे अकॅडमीत आढळल्यास, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष अभिजीत कांजर, राधानगरी तालुका अध्यक्ष संतोष बरगे, जिल्हा सहसंघटक नागनाथ बेनके, करवीर सचिव सरदार पाटील, शहाजी पाटील, संकेत साळोखे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button