नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद, विमानतळ सुरक्षा धोक्यात कारण.

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी हा महत्त्वाचा रस्ता शनिवार मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. देशातील सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि विमानतळाला असलेला हाय अलर्ट यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी बाजूने हा रस्ता जात असल्याने विमान वाहतुकीसाठी तो धोकादायक ठरत होता. विमानतळ प्रशासनाने या संदर्भात संबंधित विभागाला तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्ता बंद करण्याची विनंती केली होती. नेव्हिगेशन आणि इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (Navigation and Instrument Landing System) सह इतर आवश्यक उपकरणे बसवण्यासाठी हा रस्ता तातडीने बंद करणे गरजेचे असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने कळवले होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी विमानतळ प्राधिकरणाची मागणी आणि हाय अलर्टची गंभीरता लक्षात घेऊन शनिवारी मध्यरात्री १२ नंतर रस्ता बंद करण्याचे आदेश दिले. यानंतर तातडीने विमानतळ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.
दरम्यान, रस्ता बंदच्या आदेशानंतर तामगाव ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी पर्यायी रस्त्याची व्यवस्था होईपर्यंत रस्ता बंद करू नये, अशी विनंती केली. मात्र, विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता बंद करणे किती महत्त्वाचे आहे, हे शिंदे यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. पर्यायी रस्त्यासाठी प्रशासन सकारात्मक असून त्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिंदे यांनी सांगितले की, शनिवार मध्यरात्रीपासून उजळाईवाडी-तामगाव रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच, रविवार, ११ मे रोजी दोन्ही गावांच्या बाजूने भिंती बांधून हा रस्ता पूर्णपणे बंद केला जाईल.
ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीत उपसरपंच महेश जोंधळेकर, अमर गायकवाड, विकी मुजावर, हेमंत पाटील, अनिल पाटील, विक्रम ढाले, अभिजित मोहळकर, बाबासो गवते आदी उपस्थित होते. आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.