कोल्हापूर विमानतळावर विकास पर्व! नागपूर विमानसेवेचा शुभारंभ!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूरतील उजळाईवाडी विमानतळाच्या इतिहासात आजचा दिवस एका महत्त्वाच्या सोनेरी अक्षराने नोंदवला गेला. केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज नवीन एटीसी टॉवर (ATC Tower), तांत्रिक ब्लॉक (Technical Block) आणि अत्याधुनिक अग्निशमन केंद्राचे (Fire Fighting Center) लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याचसोबत, कोल्हापूर आणि नागपूर शहरांना जोडणाऱ्या स्टार एअरच्या नवीन विमानसेवेचा शुभारंभ देखील याच कार्यक्रमात करण्यात आला.
ही महत्त्वपूर्ण घडामोड केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. कोल्हापूर आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील हवाई कनेक्टिव्हिटीमुळे आता प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, ज्यामुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने (बापू), जिल्हाधिकारी अमोल येडगे, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे (बापू), भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर, शासकीय अधिकारी आणि विमानतळ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळाच्या या नव्या उड्डाणाने विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.