सगळीच तयार तर मग हद्दवाढीचं घोडं अडलंय कुठं? ताकतुंबा थांबवून हद्दवाढ घोषित करा -आप’चे एकनाथ शिंदेना आवाहन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, शहरातील अनियंत्रित नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांवर ताण येत असल्याने ही हद्दवाढ तातडीने होणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले तर एका दिवसात हद्दवाढीची अधिसूचना निघू शकते, असे मत आम आदमी पार्टीने (आप) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर हद्दवाढ करा आणि मगच निधी मागण्यासाठी या असे वक्तव्य केले होते, तर मित्रा संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हद्दवाढीबाबत सकारात्मकता दर्शवल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे म्हणणे आहे.
आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रश्न केला की, “सत्तेतील तिन्ही प्रमुख नेते जर हद्दवाढ करायला हवी असे म्हणत असतील, तर नेमकं घोडं अडलंय कुठं?” त्यांनी लवकरात लवकर हद्दवाढ जाहीर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.
शहरी पायाभूत सुविधा उपलब्ध नसताना शहराच्या भोवती वाढत चाललेले नागरिकरण धोकादायक असून, त्यामुळे कोल्हापूर शहराची टप्प्याटप्प्याने हद्दवाढ करावी अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे.
देसाई यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “राज्यातील सत्तेचा वाटेकरी असणाऱ्या एका प्रमुख पक्षाचे, ज्यांचे नेते स्वतः नगरविकास मंत्री आहेत, अशा नेत्यांनीच निवडणुकीवर बहिष्काराची भाषा करणे हे हास्यास्पद आहे. त्यांनी थेट ना. एकनाथ शिंदेना भेटून निवडणुकीपूर्वी हद्दवाढ करण्याबाबत आग्रह करणे आणि न ऐकल्यास कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी नगरविकास मंत्र्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसण्याची भूमिका घेतली असती, तर ती शहराच्या हिताची ठरली असती.”
यावेळी त्यांनी शिवसेना (शिंदे गट) समन्वयक व स्थानिक आमदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकेवरही टीका केली. यातील नेमकी अधिकृत भूमिका कोणाची हे शहरातील मतदारांना त्यांनी सांगावे, असे आवाहन देसाई यांनी केले. “सत्ता तुमची, नगर विकास मंत्री तुमचे तर मग एका पानाच्या अधिसूचनेसाठी एवढा ताकतुंबा का?” असा सवाल करत आता ना. एकनाथ शिंदे यांनीच हा ताकतुंबा थांबवून हद्दवाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रभाग रचना करण्याचे महापालिकेला आदेश असले तरी, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हद्दवाढीसारखा निर्णय निवडणुकीच्या सहा महिने आधी घ्यावा लागतो. त्यामुळे हद्दवाढीच्या आड लपून फक्त कोल्हापूरची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप करत निवडणुका बाकीच्या महापालिकांच्या सोबतच घ्याव्यात अशी भूमिका आपने घेतली.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, विजय हेगडे, दुष्यंत माने, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयुर भोसले आदी उपस्थित होते.