भाई माधवराव बागल यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी, पुरोगामी विचारांना अभिवादन!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापुरातील पुरोगामी विचारवंत, समाजसुधारक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी भाई माधवराव बागल यांची १२९ वी जयंती आज, बुधवारी, राजारामपुरी येथील शाहू मिल चौकातील त्यांच्या पुतळ्याला अभिवंदन करून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी असंख्य भाईप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाई माधवराव बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांच्या हस्ते बागल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवंदन करण्यात आले. याप्रसंगी ‘भाई माधवराव बागल अमर रहे!’, ‘भाई माधवराव बागल यांच्या विजयाचा जयघोष’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यानंतर पुरोगामी कार्यकर्ते अनिल घाटगे यांनी भाई माधवराव बागल यांच्या जीवनाचा थोडक्यात उलगडा केला. त्यांनी आजच्या दैनिक ‘मुक्तनायक’ आणि दैनिक ‘सकाळ’मध्ये साथी व्यंकाप्पा भोसले यांनी भाई माधवराव बागल यांच्या जीवनकार्यावर लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिला. विशेषतः, त्यांनी भाई माधवराव बागल आणि राष्ट्रीय कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या भेटीचा उल्लेख करून बागल हे त्यांच्या कार्याने देशात लोकप्रिय होते असे सांगितले. घाटगे यांनी नमूद केले की, “त्यांनी (बागल यांनी) आयुष्यभर नसलेला मानव निर्मित दगडातील देव मानला नाही, तर त्यांनी माणसात देव शोधला.”
या अभिवंदन प्रसंगी डॉ. टी. एस. पाटील, अनिल घाटगे, शिवाजी कवाळे, संभाजीराव जगदाळे, रवि जाधव, जितेंद्र के. कांबळे, शंकर काटाळे, उदय धारवाडे, चंद्रकांत यादव, व्यंकाप्पा भोसले, दगड भास्कर, सुरेश शिपुरकर, दिलीप पवार, बबन रानगे, उमेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर व भाईप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाई माधवराव बागल यांच्या पुरोगामी आणि मानवतावादी विचारांना याप्रसंगी अभिवादन करण्यात आले.