धामणी खोऱ्यात बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित; नागरिक हैराण, तातडीच्या दुरुस्तीची मागणी

धुंदवडे (विलास पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी खोऱ्यात गेल्या आठ दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची भ्रमणध्वनी सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. रेंजच्या समस्येमुळे दैनंदिन कामकाज आणि संवाद थांबल्याने नागरिक हैराण झाले असून, तात्काळ बीएसएनएल सेवा पूर्ववत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्याच्या काळात भ्रमणध्वनी सेवा ही प्रत्येकाची अत्यावश्यक गरज बनली आहे. इतर भ्रमणध्वनी कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा असली तरी, ग्रामीण भागातील अनेक ग्राहक आजही बीएसएनएलवर विश्वास ठेवून ही सेवा वापरत आहेत. मात्र, कंपनीकडून ग्राहकांच्या या विश्वासाला तडा जात असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून सेवा पूर्णपणे खंडित झाल्याने ग्राहकांना मोठी गैरसोय होत आहे.
या खंडित सेवेमुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय कार्यालये, बँका आणि इतर ठिकाणी दैनंदिन कामकाज चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वेळा संपूर्ण दिवसभर कामकाज व्यवहार ठप्प राहत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकारी यावर कोणतीही तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करताना दिसत नाहीत.
खंडित सेवेच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अनेक ग्राहकांनी आधीच दुसऱ्या कंपन्यांची सेवा स्वीकारली आहे. उर्वरित ग्राहकही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारतील, अशी शक्यता आहे. ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने विविध योजना राबवाव्यात आणि सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकवर्गातून होत आहे.
“भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनीने भ्रमणध्वनी सेवा सुरळीत करून ग्राहकांचे होणारे हाल थांबवून सुरळीत सेवा द्यावी,” अशी मागणी धुंदवडे येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांनी केली आहे.
या गंभीर समस्येकडे बीएसएनएल प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन धामणी खोऱ्यातील नागरिकांना अखंडित सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.