गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत समोरील ब्रिज ट्राफिक समस्या कायम!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आणि कणेरी फाट्या जवळील महामार्गावरील ब्रीजवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. अरुंद ब्रीज आणि त्याच्या चारही बाजूंनी असलेल्या दुकानांसमोर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, दुकानदारांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन आणि वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या ब्रीजवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी, जेव्हा औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि इतर प्रवाशांची वर्दळ जास्त असते, तेव्हा तर ही समस्या अधिकच तीव्र होते. ब्रीजची रुंदी कमी असल्याने एकाच वेळी जास्त वाहने ये-जा करू शकत नाहीत. त्यात भर म्हणून, ब्रीजच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या दुकानांसमोर ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करतात, ज्यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखीनच कमी होते.
या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात असूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही, उलट ती अधिकच वाढल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांच्या मते, वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीमुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे उलट अडथळे निर्माण होतात.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. कामावर जाण्यासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी त्यांना वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे. रुग्णवाहिकांनाही या ब्रीजवरून जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
स्थानिक नागरिकांनी आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. दुकानांसमोर होणारे अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, दुकानदारांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन तयार करावा आणि वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देऊन त्यांची कायमस्वरूपी या ब्रीजवर नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.