महाराष्ट्र ग्रामीण

इंगळीत रस्त्याची दुर्दशा, वाहतूक ठप्प; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थ आक्रमक!

इंगळी, (सलीम शेख): इंगळी गावातील ‘सहा मोठ्या विहिरीं’साठी केलेल्या भूसंपादनामुळे गावातील मुख्य रस्ता पुन्हा एकदा खचला आहे. २५ मार्च रोजी खचलेला हाच रस्ता आज, २८ मे रोजी परत खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


प्रशासनाची अनास्था, नागरिकांत संताप
विशेष म्हणजे, ज्या विहिरींसाठी हे भूसंपादन करण्यात आले होते, त्यांचे कोणतेही काम सध्या चालू नाही. तरीही रस्ता खचत असल्याने आणि या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, ‘या दुर्घटनेत काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा, सह्यांची मोहीम सुरू
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना त्वरित कार्यवाही करण्यास भाग पाडण्यासाठी, गावातील नागरिक आता उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. या लढ्यासाठी स्थानिक नागरिक केशव पाटील, शहानूर नाईकवाडी, बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
इंगळीतील नागरिक आता प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी करत आहेत. प्रशासनाला कधी जाग येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button