महाराष्ट्र ग्रामीण

कागल तालुका शैक्षणिक सलोखा मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पर्यावरणपूरक उपक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात!

कागल (सलीम शेख ) : कागल तालुका शैक्षणिक सामाजिक सलोखा मंच कागल यांच्या वतीने आज कागल येथील दर्गा हॉल, गैबी चौक येथे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी “चला वसुंधरा जपूया” असा संदेश देत वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाचे पर्यावरणपूरक उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने झाली. कोल्हापूर जिल्हा तालुका मंचचे जिल्हाध्यक्ष हाजी कादरभाई मलबारी यांनी प्रास्ताविक केले. “प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. समाजातील मुलांनी तलाठी व्हावे आणि त्यांच्या पालकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच सलोखा मंचाची उद्दिष्ट्ये आणि कार्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सलोखा मंचाच्या इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कार्याचे कौतुक केले. “सलोखा मंच गेली अनेक वर्षे कौटुंबिक आणि सामाजिक वाद मिटवून पोलिसांचे आणि प्रशासनाचे महत्त्वाचे काम करत आहे,” असे ते म्हणाले. “कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जिल्हा आहे आणि कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. येथे मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे,” असे सांगत त्यांनी सलोखा मंचाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समीर नाईकवाडी यांनी उपस्थितांचे स्वागत आणि आभार मानत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रमुख मार्गदर्शक व वक्ते मुजावर सर यांच्या शिक्षण आणि जीवनाबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक मुजावर सर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरबद्दल मार्गदर्शन केले. गजेंद्र लोहार यांच्याबद्दल त्यांनी शेर-ओ-शायरीमध्ये प्रशंसा केली. इतर देशांच्या तुलनेत आपण शिक्षण आणि कुशलतेमध्ये दहा वर्षे मागे आहोत, असे ते म्हणाले. जपानी लोक आपल्या मुलाच्या जन्मापूर्वीच त्यांच्या शिक्षणाचे नियोजन करतात, त्यामुळे तेथील मुले सर्व क्षेत्रांत यशस्वी होत आहेत, असे उदाहरण त्यांनी दिले. भारतात ८० टक्के अभियंते बेरोजगार आहेत, कारण त्यांच्याकडे पदवी असली तरी कुशलतेचा अभाव आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. “जिद्दीने आणि योग्य दिशा निवडून आपण यशाच्या उंच शिखरावर पोहोचू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकांनी मुलांची योग्यता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि विद्यार्थ्यांनी पालकांचे ऐकून योग्य दिशा निवडून आपले जीवन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमाला आमदार हसन मुश्रीफ, निरीक्षक गजेंद्र लोहार, प्राचार्य, डॉक्टर, आयन मुजावर सर, हाजी कादरभाई मलबारी, हाजी शौकत मुजावर, हाजी गौस नदाफ, सरफराज जमादार, आरिफ तांबोळी, हाजी बाबासाहेब काजी, हाजी सुलतान काजी, मुस्ताक मुल्ला, कासिम मुल्ला, समीर नाईकवाडी, राजू शाहनेदिवाण, अखलाक नायकवडी, अल्ताफ काजी, हिदायित नाईकवाडी, मौलाना अलीम, जावेद मकानदार, अझर नाईकवाडी यांच्यासह इतर पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button