उजळाईवाडी विमानतळ परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाकडून खोदकाम सुरू!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : उजळाईवाडी विमानतळाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानतळ ते तामगाव-नेर्ली, हलसवडे, सांगवडेवाडी, विकासवाडी हा महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आज प्रशासनाकडून या रस्त्याच्या तिन्ही बाजूने खोदकाम करून तो वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी एक भक्कम भिंत देखील उभारली जाणार आहे.
आज करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यावेळी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात हे खोदकामाचे काम करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी संबंधित गावांतील कोणत्याही नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहून या कारवाईला विरोध दर्शविला नाही.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असली, तरी विमानतळाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबणार असून, परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
विमानतळ प्रशासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव उचलण्यात आलेल्या या कठोर पावलामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी असली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.