महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत विकास आराखड्यावर मंथन; मनुष्यबळ वाढवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहराच्या परिसरातील ४२ गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, “प्राधिकरणाची स्थापना कोल्हापूरच्या आसपासच्या ४२ गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, प्राधिकरणात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे कामांना गती मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या स्तरावर तातडीने रिक्त जागा भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


यावेळी ४२ गावांसाठी कोल्हापूर शहराशी सुसंगत असा विकास आराखडा तयार करण्यावर चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना १५ जूनपर्यंत हा विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. या आराखड्याच्या तयारीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक विकास प्राधिकरणांच्या विकास आराखड्यांचा अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
बैठकीत कामात दिरंगाई करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर चौकशी समिती स्थापन करून कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांच्यासह प्राधिकरणाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button