अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोल्हापूर, सांगली, सातारा येथे जनआंदोलन; सरकारला चर्चेसाठी बोलावण्याची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि हजारो नागरिकांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. सरकारकडून बैठकीचे निमंत्रण मिळेपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीबाबत प्रश्न उपस्थित केले, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. आता हा लढा असाच सुरू ठेवला नाही, तर अलमट्टी धरणाचे भूत कायम आपल्या मानगुटीवर असेल. समितीने काही हरकती पाठवल्या आहेत. आता सर्वांनीही दिल्लीपर्यंत त्या पाठवून रस्त्यावरच्या लढाईसोबत कागदोपत्री आणि कायदेशीर लढाई लढण्याची गरज आहे.”
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसाठी केंद्राकडे १ लाख कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तेलंगणा राज्याने या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर, महाराष्ट्र सरकारनेही ठोस कारणांसह केंद्र सरकारसमोर आपली भूमिका मांडावी आणि आवश्यक वाटल्यास न्यायालयात जावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या भागातील शेतकरी आणि अभ्यासकांचा समावेश असलेली नवीन समिती स्थापन करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत सरकार चर्चेसाठी बोलावण्यास तयार होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरुच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.