नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कणेरी फाटा ते कणेरीवाडी रस्त्याची दुरवस्था!

कणेरीवाडी (सलीम शेख) : कणेरी फाटा कमानी लागून ते कणेरीवाडी असलेला रस्ता पावसामुळे अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातही घडले असून, खड्ड्यातील पाण्यामुळे पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडाल्याने वादाचे प्रसंगही निर्माण होत आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, प्रशासनने लवकरात लवकर हे खड्डे भरून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कणेरी फाटा ते कणेरीवाडी पर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने आदळून किरकोळ अपघात घडले आहेत.
याशिवाय, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते पाणी ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडून कपडे खराब होत आहेत. यामुळे अनेकदा वाहनचालक आणि पादचारी यांच्यात शाब्दिक चकमकी आणि वादाचे प्रसंग घडत आहेत.स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी,” अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. लवकरात लवकर रस्त्यातील खड्डे बुजवून वाहतुकीसाठी सुस्थितीत आणावा, अशी मागणी होत आहे.