कणेरीवाडीत जलकुंभ सोहळा उत्साहात संपन्न!

कणेरीवाडी (सलीम शेख) : कणेरीवाडी गावाचा अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न आता मार्गी लागणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या दोन भव्य जलकुंभांचे लोकार्पण नुकतेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी बोलताना शाहू महाराज म्हणाले, “कणेरीवाडीचा दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडवणे हे केवळ सुविधा देणे नव्हे, तर खरं लोकशाहीचे काम आहे. या जलजीवन मिशनच्या प्रकल्पामुळे गावाला अनेक वर्षांसाठी मोठा फायदा होणार आहे.”
या लोकार्पण सोहळ्याला खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. २ कोटी २९ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या योजनेत १.५५ लाख आणि ३.५ लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ कार्यान्वित झाले आहेत. या जलकुंभांसाठी जागा उपलब्ध करून देणारे किरण चव्हाण, शिरीष चव्हाण, गणेश चव्हाण कुटुंबीय तसेच माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व त्यांच्या मातोश्री यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान खासदार विशाल पाटील यांनी कणेरी गावातील नागरिकांच्या एकजुटीचे कौतुक केले. ते म्हणाले, “गावातील नागरिकांची एकी पाहून मला खूप आनंद झाला. ही एकी अशीच कायम राहो.” त्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे आभार मानताना त्यांचे बलिदान नेहमीच स्मरणात राहील असे नमूद केले. महिलांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे आनंदित होऊन त्यांनी सर्वांसाठी खास लाडू आणल्याचे सांगितले आणि सर्वांनी मिळून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमात गावकऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्याचे खासदार पाटील यांनी कौतुक केले आणि गावाला विकासासाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार ऋतुराज पाटील आणि शशिकांत खोत यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, सरिता खोत, सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शोभा खोत, अजित मोरे, शिवाजीराव मोरे, प्रकाश खोत, राजेश कदम, सदाशिव म्हाकवे, आप्पासो मोरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद खोत, सचिन खोत, रूपाली माने, अश्विनी कोथळे, सुरेश हसुरे, महादेव वारके, कृष्णात शेळके, सुरेखा खोत, रविराज घोडके, अशोक माने यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.