पंजाब डख यांचा हवामान अंदाज: राज्यात २५ मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा!

कोल्हापूर, (सलीम शेख) : हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २५ मे पर्यंत अनेक ठिकाणी अति मुसळधार ते अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपली शेतीतील कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन डख यांनी केले आहे.
- कोकण विभाग: या विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र: या भागांमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल.
- मराठवाडा: मराठवाड्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला.
डख यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, हा पाऊस भाग बदलत पडणार असल्याने दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापूर्वी आपली सर्व कामे आटपून घ्यावीत. ज्या शेतकऱ्यांची भुईमूग, उडीद, हळद यांची काढणी झालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावी, असेही ते म्हणाले.
पुढील आठ दिवसांमध्ये राज्यात दमदार पावसाची शक्यता असून, यामुळे ओढ्या आणि छोट्या नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागामध्ये पाऊस हजेरी लावेल, पण हा पाऊस भाग बदलत बदलत पडेल आणि प्रत्येक ठिकाणी दोन-तीन दिवस मुक्कामी असेल, असेही डख यांनी सांगितले. हा पाऊस साधारणतः पावसाळ्याप्रमाणेच असेल.
मान्सूनची स्थिती पुढीलप्रमाणे
१ जून नंतर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून चांगलीच हजेरी लावेल, असा अंदाजही पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यास लगेच अद्ययावत माहिती दिली जाईल, असे डख यांनी सांगितले आहे.