पट्टणकोडोली ग्रामपंचायतीत ‘अॅक्शन मोड’! कर्मचाऱ्यांवर कारवाई, ग्रामसेवकही नोटीसच्या रडारवर!

पट्टणकोडोली ( सलीम शेख ): पट्टणकोडोली ग्रामपंचायत सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. सरपंच अमोल बाणदार आणि सदस्य ‘अॅक्शन मोड’मध्ये आले असून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, तर ग्रामसेवकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीचे लिपीक अभिजीत पाटील आणि सुनिल अवघडे या दोघांना एक महिन्यासाठी बिनपगारी सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश सरपंच अमोल बाणदार यांनी दिले आहेत. तसेच, नोटीसचा लेखी खुलासा न केल्यास तीन महिन्यांसाठी कामावरून कमी करण्यात येईल, असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे. याशिवाय, पाणी सोडणाऱ्या यशवंत कांबळे यांनाही एक महिना रजेवर पाठवण्यात आले आहे. ग्रामसेवकांनाही नोटीस बजावण्यात आल्याने पट्टणकोडोली ग्रामपंचायतीत सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
लिपीक अभिजीत पाटील आणि सुनिल अवघडे यांच्यावर नेमून दिलेल्या कामात कर्तव्यात कसूर, अनियमितता, अपारदर्शक काम आणि पंचायतीच्या नियमांविरुद्ध कामकाज केल्याचा आरोप आहे. विशेषत: घरफाळा वसुली केल्यानंतर वसूल केलेली रक्कम दीड महिना बँक खात्यात जमा न केल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली होती.
या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी टी.एम. हणमंते यांनी सांगितले की, त्यांना ग्रामपंचायतीकडून १६ मे २०२५ रोजी नोटीस मिळाली आहे. ही नोटीस त्यांनी स्वीकारली असून, ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी यांना लेखी खुलासा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांनी १६ मे रोजी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात कसूर आढळून आल्याने नोटीसीद्वारे कारवाई केली असल्याचे सांगितले. तसेच, १९ मे रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावून संबंधितांवर पुढील कारवाईचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पट्टणकोडोली ही जिल्ह्यातील एक मोठी ग्रामपंचायत मानली जाते. त्यामुळे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा ग्रामपंचायतींवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत लोकांकडून व्यक्त होत आहे.
इतर ग्रामपंचायतींमध्येही धाकधूक दरम्यान, पट्टणकोडोली ग्रामपंचायतीतील या नोटीस आणि कारवाईच्या निर्णयानंतर इतर ग्रामपंचायतींमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. बहुतेक ठिकाणी असेच फर्मान निघेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.