गारगोटीतील स्वातंत्र्यस्मारक हटविल्याने नागरिक संतप्त; बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू!

गोरगोटी (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे स्वातंत्र्यलढ्याच्या स्मारकाचे अतिक्रमण हटविल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निषेधार्थ गारगोटी ग्रामस्थांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यात वीरमरण पत्करलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला हटविल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही घटना अत्यंत क्लेशकारक असून, यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला आहे.
आंदोलकांनी स्मारकाच्या जागेवर पुन्हा स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि इतिहासाची आठवण करून देणाऱ्या स्मारकांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.