महाराष्ट्र ग्रामीण

उदगाव वैकुंठधाम येथे अघोरी आणि करणी भानामतीचे प्रकार सीसीटीव्हीत कैद; परिसरात खळबळ!

जयसिंगपूर (सलीम शेख ) : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या काठी असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत गेल्या काही दिवसांपासून काही महिला आणि पुरुषांकडून भरदिवसा नग्न होऊन करणी आणि भानामतीचे प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, यामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अंधश्रद्धेच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वैकुंठधाम येथे तातडीने सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


नेमके काय घडले?मिळालेल्या माहितीनुसार, उदगाव वैकुंठधाममध्ये उदगाव, जयसिंगपूर, संभाजीपूर, चिपरी बेघर, धरणगुत्ती (लक्ष्मीनगर) आणि मौजे आगर येथील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात, त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील एका वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे कुटुंबीय उदगाव वैकुंठधाम येथे आले होते. रक्षाविसर्जनाच्या दिवशी नातेवाईक पुन्हा वैकुंठधाममध्ये आले असता, त्यांना अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी ठेवलेली रक्षा बाजूला ढकलून त्या जागी बाहुली, नारळ आणि सुया असलेल्या चिठ्ठ्यांसह पूजेचा प्रकार निदर्शनास आला. हा करणी भानामतीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.


ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही तपासले असता, महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वेळी, विशेषतः अमावस्या, पौर्णिमा, शनिवार आणि बुधवार या दिवशी भरदिवसा नग्न होऊन अघोरी पूजा करताना दिसले. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे उदगाव आणि जयसिंगपूरमध्ये अंधश्रद्धेचे प्रकार वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.


प्रशासनाकडून उपाययोजनांची मागणी
या प्रकारांना आळा घालण्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिक करत आहेत. स्वीकारून तेथे सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात उदगावचे सरपंच सलीम पेंढारी यांनी सांगितले की, “उदगाव वैकुंठधाममध्ये अघोरी आणि करणी भानामतीचे प्रकार सातत्याने होत आहेत. ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या सर्व घटना कैद झाल्या आहेत. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनाही याबाबतची सर्व माहिती दिली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत.”
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने या अंधश्रद्धेच्या प्रकारांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button