महाराष्ट्र ग्रामीण

कागलच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, नागरिक हैराण!

कागल (सलीम शेख) : कागल येथे दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार सध्या मोबाईल चोरट्यांच्या दहशतीखाली आहे. बाजारात भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांना लक्ष्य करत त्यांच्या खिसे आणि पर्समधून मोबाईल लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. चोरटे अत्यंत चलाखीने गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरून पसार होत आहेत. यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांना सतत दक्ष राहावे लागत आहे.
लक्ष्मी टेकडी ते पंचतारांकित एमआयडीसी रस्त्यावरही लुटमारीच्या घटना


केवळ आठवडी बाजारच नाही तर लक्ष्मी टेकडी ते पंचतारांकित एमआयडीसी (MIDC) रस्त्यावरही रात्रीच्या वेळी लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. या मार्गावर ट्रक चालक आणि मोटारस्वारांना अडवून लुटण्याच्या घटना घडत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून, या परिसरात बंद पडलेल्या ट्रकमधील चालकांना धमकावून त्यांच्या ट्रकच्या टाकीतील डिझेल चोरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


या संदर्भात कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकारांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच, लवकरच या चोरट्यांना जेरबंद केले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. कागलमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पाऊले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button