राष्ट्रीय महामार्गावर कचऱ्याचे ढिगारे: गोकुळ शिरगाव MIDC परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात!!

कणेरी (इरफान मुल्ला) : गोकुळ शिरगाव MIDC जवळील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महामार्गालगतच कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. काढलेल्या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात फेकण्यात आल्या आहेत. या कचऱ्यामुळे परिसरातील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. विशेषतः, यातून निर्माण होणारी तीव्र दुर्गंधी वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठीही अत्यंत त्रासदायक ठरत आहे. तसेच या कचऱ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खाद्यविक्रेते स्टॉल आहेत. यामध्ये वडापाव गाडी ,भेल ,बेकरी, चायनीज सेंटर आहेत.
स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जर यावर त्वरित उपाययोजना केली नाही, तर आगामी पावसाळ्यात या कचऱ्यामुळे अधिक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी चिंताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.