महाराष्ट्र ग्रामीण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘दख्खन केदारण्य’ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ऑनलाइन उपस्थिती लक्षवेधी ठरली!

वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर (सलीम शेख) : ६ जून २०२५ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने “दख्खन केदारण्य” वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी हे देखील ऑनलाइन उपस्थित होते.


या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये ‘केदार विजय’ ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ “दख्खन केदारण्य” साकारण्यात येत आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आपल्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. आपले सर्व देव देवता निसर्गाशी साधर्म राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणारे आहेत. निसर्गाची सेवा केल्याशिवाय आपला नमस्कार कोणत्याच देवतांपर्यंत पोहोचत नाही.”


या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर ऑनलाइन उपस्थित होते. तर कार्यक्रमस्थळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू), पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयेन, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता संजय कदम, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर), वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच. आर. जाधव (आण्णा), माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्यासह अनेक मान्यवर व वाडी रत्नागिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button