सरनोबतवाडीत ओढ्यातून वाहून गेलेल्या सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत!

सरनोबतवाडी (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील धोंडेनगरमध्ये राहणारा आणि इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावीत शिकणारा अमन भालदार (वय ११) याचा ओढ्यातून वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. काल (गुरुवार) सायंकाळी वाहून गेलेल्या अमनचा मृतदेह आज (शुक्रवार) सकाळी शोधमोहिमेदरम्यान सापडला..
ही हृदयद्रावक घटना काल सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. अमन हा शिकवणीसाठी उजळाईवाडीतून सरनोबतवाडीच्या दिशेने सायकलवरून निघाला होता. सरनोबतवाडीतील ओढ्यातून पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने अमान सायकलसह ओढ्यात उतरला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो वाहून गेला.
घटनेदरम्यान परिसरातील वीट कारखान्याचे मालक विजय आडवे आणि त्यांच्या कामगारांनी अमनला वाचवण्याचा प्रयत्न केला. काहीवेळ अमन ओढ्यातील एका बेटाला धरून उभा होता. मात्र, त्याच्या जॅकेटमध्ये पाणी भरल्याने ते त्याच्या चेहऱ्याभोवती गुंडाळले गेले आणि त्याचा पुन्हा तोल गेला. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने अमान ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. परंतु, ओढ्याच्या काठावर दाट झाडी, चिखल, अंधार आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे शोधमोहिमेत अनेक अडचणी आल्या. रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली. प्रशासनाने आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता, अमनचा मृतदेह सापडला आणि त्याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमीने परिसरात शोककळा पसरली. यावेळी नातेवाईकांनी मृत्यू देव पाहून हंबरडा फोडला.