पोलिस दलाचे कार्य शिवछत्रपतींच्या आदर्शानुसारच; महिला संरक्षणाला विशेष प्राधान्य: अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांचे प्रतिपादन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करतच राज्यात पोलिस दलाचे कार्य सुरू असून, महिलांचा आत्मसन्मान आणि त्यांचे संरक्षण ही पोलिस दलाची प्रमुख जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांनी केले. कोल्हापुरात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ गार्गीज आणि जितो कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था गेल्या १८ वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, रोजगारविषयक उपक्रमांद्वारे संस्थेने ३८ हजार महिलांना स्वावलंबी बनवले आहे. अलिकडील काळात महिलांवरील अत्याचार आणि सायबर फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, शाहू स्मारक भवन येथे ही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू, पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि मंजीरी महाडिक उपस्थित होते. श्रृती पुंगावकर यांच्या सेल्फ डिफेन्स अकादमीच्या खेळाडूंनी यावेळी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
यावेळी बोलताना अरूंधती महाडिक यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, पोलिस दलाकडून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवले जातेच, परंतु अशा घटना रोखण्यासाठी महिलांचे प्रबोधन आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी स्वतःसह विविध व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. भागीरथी महिला संस्थेने महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी उचलली असून, इतर संस्थांनीही महिला संरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांनी नागरिकांना सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, समाजातील काही अपप्रवृत्तींकडून महिलांवर विविध माध्यमातून अत्याचार होत आहेत, ज्यांना आळा घालण्यासाठी पोलिस दल २४ तास कटिबद्ध आहे. कोणत्याही फसवणुकीची किंवा महिला अत्याचार किंवा देशविघातक घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी महिलांना छळ किंवा अत्याचार थांबवण्यासाठी पोलिसांच्या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आणि जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तात्काळ मदत घेण्याचे आवाहन केले. पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी ऑनलाईन फ्रॉड, तंत्रज्ञानाद्वारे फसवणूक, अन्याय, अत्याचार टाळण्यासाठी पोलिसांच्या विविध विभागांच्या हेल्पलाईन आणि मोबाईल नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले. पोलिस दल महिलांच्या सदैव पाठीशी उभे आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान रोटरीचे बी.एस. शिंपुकडे, वन स्टॉप सखी केंद्राच्या निलम धनवडे, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षक श्रृती पुंगावकर, योगिनी कुलकर्णी, माया राठोड, स्वीटी पोरवाल, महेश्वरी गोखले यांचा सत्कार करण्यात आला.