सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव: कचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराने नागरिक संतप्त, प्रदूषणाचा धोका वाढला!!

कोल्हापूर (सलीम शेख ) : सरनोबतवाडी, उजळाईवाडी आणि गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार आता नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मोठा धोका बनला आहे. गावागावातून कचरा गोळा करण्याचे काम ग्रामपंचायतींकडून केले जात असले तरी, या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे काम म्हणजे गावातील स्वच्छता राखणे आणि प्रदूषण नियंत्रण करणे. यासाठी घराघरातून कचरा गोळा केला जातो. परंतु, अनेकदा कचरा गोळा करण्याचे काम अनियमितपणे होत असल्याने, नागरिकांना नाइलाजास्तव कचरा रस्त्याच्या कडेला, ओढ्या-नाल्यांमध्ये फेकावा लागतो. यामुळे गावातील काही ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, जे स्वच्छतेसाठी मोठा अडथळा ठरत आहेत.
गोळा केलेल्या कचऱ्याचे नेमके काय होते, याबद्दल नागरिकांमध्ये मोठे प्रश्नचिन्ह आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते का? त्याचे वर्गीकरण होते का? पुनर्वापर (रिसायकल) होतो का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. वास्तविक पाहता, हा कचरा गावातील एका विशिष्ट ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढिग करून ठेवला जातो. या कचऱ्याचे कोणत्याही प्रकारे वर्गीकरण (शॉर्टिंग) केले जात नाही. ओला कचरा, विशेषतः भाजीपाला आणि इतर सेंद्रिय कचरा, खत निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो, परंतु तो सुक्या कचऱ्यासोबत (प्लास्टिक, कागद इत्यादी) मिसळला जातो. यामुळे कचऱ्याचे ढिगारे मोठे होत जातात.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे ढिगारे नंतर विशिष्ट खड्ड्यांमध्ये किंवा मोकळ्या जागेत टाकले जातात आणि नंतर त्यांना सरळ पेटवून दिले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि विषारी वायू वातावरणात मिसळतात, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढते. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना आणि परिसरातील रहिवाशांना या धुरामुळे आणि दुर्गंधामुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
प्रदूषण कमी व्हावे आणि गावात स्वच्छता राखली जावी या उद्देशाने कचरा गोळा केला जातो, परंतु उलट तोच कचरा जाळून प्रदूषणात भर घातली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. “हे कधी बंद होणार?” असा प्रश्न नागरिक वारंवार विचारत आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण, आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार, असे अनेक प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.
ग्रामपंचायतींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना करणे तातडीचे आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, खत निर्मिती, पुनर्वापर आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अन्यथा, प्रदूषणाचा वाढता धोका आणि नागरिकांचा असंतोष अधिक वाढण्याची शक्यता आहे.