तामगाव ‘जल जीवन मिशन’ कामात गैरव्यवहार? चौकशीची मागणी!

तामगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील तामगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तामगाव येथील नागरिक विक्रम उत्तम ढाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ढाले यांच्या तक्रारीनुसार, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तामगावमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, ज्या ठिकाणी पाहणी (सर्वे) झाली आहे, त्यापैकी काहीच ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी अद्यापही पाईपलाईन टाकलेली नाही. याउलट, ज्या भागाचा सर्वे करण्यात आलेला नव्हता, अशा ठिकाणीही पाईपलाईन टाकण्यात आल्याचे ढाले यांनी म्हटले आहे.
या कामामध्ये वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही ढाले यांनी केला आहे. यामुळे योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
विक्रम ढाले यांनी गटविकास अधिकारी डॉ.संदीप भंडारे विनंती केली आहे की, तामगावमध्ये जल जीवन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण असलेल्या सर्व कामांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच, पुढील कामे योग्य ठेकेदारालाच देण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या गंभीर गैरव्यवहारासाठी दोषी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ढाले यांनी केली आहे. जर या प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या तक्रारीमुळे तामगावमधील ‘जल जीवन मिशन’च्या कामांची सत्यता लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे