महाराष्ट्र ग्रामीण

उजळाईवाडी धबधबा बनला नवा सेल्फी पॉईंट; पर्यटकांची गर्दी!

उजळाईवाडी (सलीम शेख ) : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूरजवळच्या उजळाईवाडी येथील विमानतळ रस्त्यावरील उजळाईदेवी मंदिर परिसरात एक मनमोहक धबधबा प्रवाहित झाला आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे अचानक प्रकटलेला हा धबधबा आता रील स्टार्स, पर्यटक, स्थानिक आणि देवीभक्तांसाठी एक आकर्षक सेल्फी पॉईंट बनला आहे. हिरव्यागार निसर्गाने नटलेला हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.


कोल्हापूर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उजळाईवाडी गावात प्रसिद्ध उजळाईदेवीचे मंदिर आहे. या परिसरात सध्या प्रवाहित झालेला हा धबधबा वर्षभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. येथील गर्द हिरवाई अनेकांना भुरळ घालत आहे. मात्र, प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे, कारण पावसामुळे परिसर निसरडा झाला असून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त सेल्फी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाळवे राधानगरी येथून आलेल्या कल्पना पाटील यांनी सांगितले की, “आम्ही कोल्हापूरची नवदुर्गा उजळाईदेवीच्या दर्शनासाठी आलो होतो. मंदिर खूपच सुंदर आहे, पण येथे धबधबा पाहून आमचा आनंद द्विगुणित झाला. आम्ही सर्वजणींनी धबधब्यासोबत सेल्फी घेतला आहे.”


उजळाईवाडी येथील कल्पना कुंडलिक पाटील यांनी सांगितले की, “उजळाईवाडीची उजळाईदेवी आणि महादेवाच्या मंदिरात मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची गर्दी असते. येथे पावसाच्या पाण्यामुळे धबधबा प्रवाहित झाल्याने हा सेल्फी पॉईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.”
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उजळाईवाडी गावातील या नयनरम्य दृश्यामुळे अनेक हौशी आणि स्थानिक मंडळींचे कॅमेरे आणि मोबाईल या धबधब्याचे क्षण टिपण्यासाठी सरसावत आहेत, असे निसर्गमित्र मोहन सातपुते यांनी सांगितले. एकूणच, हा धबधबा सध्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि छायाचित्रणाचा एक उत्तम संगम ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button