महाराष्ट्र ग्रामीण

धुंदवडे – म्हासुर्ली मार्ग बनला जीवघेणा; नागरिकांची तत्काळ दुरुस्तीची मागणी!

धुंदवडे (विलास पाटील): धुंदवडे येथील धामणी नदीवरील चौधरवाडी ते म्हासुर्ली दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व त्याला जोडणारा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. म्हासुर्लीकडील बाजूस मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्यावरील भराव वाहून गेल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक ठरत आहे.


या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. बंधाऱ्याकडील बाजूस असलेला तीव्र उतार वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे, त्यांना येथून मार्ग काढताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. राधानगरी ते गगनबावडा या महत्त्वाच्या रस्त्याला जोडणारा हा मार्ग असल्यामुळे याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


दळणवळणाचा प्रमुख मार्ग दुर्लक्षित
धामणी खोऱ्यासाठी दळणवळणाचा मोठा आधार असलेल्या या रस्त्याकडे संबंधित विभागाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. म्हासुर्ली येथे बाजारपेठ असल्याने धुंदवडे आणि परिसरातील नागरिकांचे या मार्गावरून सतत दळणवळण सुरू असते.
डी. एस. पाटील, प्राथमिक शिक्षक, म्हासुर्ली यांनी सांगितले की, पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याने रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button