जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम: वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

कागल (सलीम शेख ) : ५ जून २०२५: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज कागल नगरपरिषदेने प्रधान सचिवांच्या सूचनेनुसार, ‘वृक्षारोपण मोहीम’ आणि ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ या दोन्ही महत्त्वाकांक्षी उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले. जयसिंगराव तलाव येथे झालेल्या या कार्यक्रमात वृक्षारोपण आणि कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
प्रधान सचिवांनी दि. २ जून २०२५ रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, ५ जून २०२५ पासून राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या महानगरपालिकांना प्रत्येकी २५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याच अनुषंगाने कागल नगरपरिषदेनेही जयसिंगराव तलाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमर वाकडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच कागल शहरातील महिला बचत गटाच्या सर्व महिला सदस्य, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या वर्षी UNEP (युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम) मार्फत “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत” ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्देशानुसार एकल प्लास्टिकचा वापर व निर्मिती कमी करण्यासाठी आणि शाश्वत पर्यायांचा विकास व प्रोत्साहन देण्यासाठी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम प्लास्टिकमुक्त कागलच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
याव्यतिरिक्त, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सुका कचरा विलगीकरण, पृथ्थकरण, संकलन, विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याच्या अनुषंगाने Kirloskar Oil Engines आणि Sampoorna Arth Livelihood या संस्थांच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून, घनकचरा प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांना पुनर्वापर आणि पुनर्विक्री स्क्रॅप मटेरिअल विक्रीतून मिळालेला प्रोत्साहनपर लाभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कागल नगरपरिषदेला विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कागल नगरपरिषदेने पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे कागल शहर अधिक स्वच्छ आणि हरित होण्यास मदत होईल.