महाराष्ट्र ग्रामीण

सीपीआर रुग्णालयाच्या मार्गावरील खड्ड्यांमुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त; प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) कडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे कधी लक्ष जाणार आणि रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.


जिल्ह्याला दोन वैद्यकीय मंत्री असतानाही सीपीआर रुग्णालयाच्या मार्गाची ही दयनीय अवस्था अतिशय चिंताजनक आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या खराब रस्त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेदनांनी त्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांना घेऊन येणारे नातेवाईक खड्ड्यांमुळे होणाऱ्या धक्क्यांनी अधिकच त्रासले जात आहेत. यामुळे वेळेचा अपव्यय होत असून, रुग्णालयात पोहोचण्यासही विलंब लागत आहे.
“आमच्यासाठी हे रुग्णालय जीवनावश्यक आहे, पण इथे पोहोचणं म्हणजे एक आव्हानच बनलं आहे,” असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. “प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का आहे? कोल्हापूर जिल्ह्याला दोन वैद्यकीय मंत्री असतानाही अशी परिस्थिती असणे लाजिरवाणे आहे,” असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले.


या परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिमेलाही धक्का लागत आहे, कारण जिल्ह्याचे प्रमुख रुग्णालय गाठण्याचा मार्गच अडथळ्यांनी भरलेला आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन, सीपीआरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांकडून जोर धरत आहे. यावर प्रशासन कधी पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button