गोकुळ शिरगावमध्ये चाकू हल्लात दोघे गंभीर जखमी!

कणेरी (इरफान मुल्ला) : गोकुळ शिरगाव दोन मित्रांना एका मुलीच्या भावाने मारहाण केली.ही घटना बहिणीसोबत बोलण्यावरून झालेल्या वादातून चाकू हल्ल्याची समोर आली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास एमएससीबी कार्यालयासमोर हा प्रकार घडला.
या घटनेची तक्रार साहिल शिवाजी वाघमारे (वय २१, रा. कागले माळ, गोकुळ शिरगाव) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात वैभव तानाजी पाटील आणि संशयित आरोपींपैकी एक सौरभ चोरडे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सौरभ मोहन चोरडे (रा. कणेरी), आयुष चव्हाण (रा. कणेरवाडी), सनी चव्हाण (रा. कणेरवाडी) आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी सौरभ चोरडे याने वैभव पाटीलला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी वैभव पाटीलने माफी मागण्यास सुरुवात केली. मात्र, चोरडेने त्याच्या कानशिलात मारून डोक्यात बिअरची बाटली फोडली. त्यानंतर सनी चव्हाण आणि अनोळखी व्यक्तीने वैभवला पकडून ठेवले, तर आयुष चव्हाणने चाकूने त्याच्या हातावर वार करून त्याला जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी गेलेले साहिल वाघमारे आणि त्याचा मित्र शिवानंद यांनाही आरोपींनी मारहाण केली आणि ‘परत आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.
गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम हे तपास अधिकारी आहेत.