महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद, 46 मोबाईल जप्त

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 3,58,500 रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 46 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोल्हापूर रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील तीन संशयित शाहूपुरी भाजी मंडई परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी भाजी मंडई परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 46 मोबाईल सापडले.
अटक करण्यात आलेले
गणेश अनिल माने (वय 23, रा. नागोबावाडी, पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
महादेव राजाराम पाटील (वय 34, रा. साजणी, ता. हातकंगणले, जि. कोल्हापूर)
गणेश शिवाजी माने (वय 27, रा. कोळा, पुजारी वस्ती, गौडवाडी रोड, सोलापूर)
जप्त केलेले मोबाईल आणि आरोपींना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार आणि अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे आणि अन्य पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button