महाराष्ट्र ग्रामीण

विटा पोलिसांच्या दादागिरी विरोधात वकील संघटनेचा मोर्चा

विटा: विटा येथे एका वकिलाला पोलिस ठाण्यात मारहाण झाल्याचा आणि कुटुंबाला नाहक त्रास दिल्याचा निषेध करत वकील संघटनेने पोलिसांविरोधात मोर्चा काढला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषतः वकील समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी दिला आहे.

ही घटना २ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. वकील विशाल कुंभार यांच्या घरासमोर काही पोलिस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत मोठ्याने हसणे, हॉर्न वाजवणे असे प्रकार करत होते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास होत होता. वारंवार विनंती करूनही यात कोणताही बदल झाला नाही. त्या रात्री विशाल कुंभार यांचे वडील पुन्हा पोलिसांना शांततेत काम करण्यास सांगायला गेले असता, एका महिला कर्मचाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी विशाल कुंभार यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांच्या वडिलांना धक्काबुक्की करून विशाल यांना एखाद्या मोठ्या गुन्हेगाराप्रमाणे गाडीत टाकून पोलिस ठाण्यात नेले. पोलिस ठाण्यात त्यांना रात्री दीड वाजेपर्यंत बसवून ठेवले. पोलिसांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर दिला नाही तर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अखेर डीव्हीआर दिल्यानंतरच पहाटे २ वाजता त्यांना सोडण्यात आले.
पोलिसांचा डीव्हीआर नेण्याचा उद्देश काय?
या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसताना पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर का नेला, याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी केलेला अन्याय लपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही केला जात आहे.
वकील संघटनेचा तीव्र निषेध
विशाल कुंभार यांच्यावर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात विटा वकील संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी दंडाला काळ्या फिती लावून पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी ‘कायद्याचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा’ अशा घोषणा देत वकिलांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही वकिलांनी दिला आहे.
या घटनेमुळे पोलिसांची दादागिरी आणि सामान्य नागरिकांवरील वाढत्या अन्यायाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button