पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय अपघातांचे केंद्र

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ): पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर व सेवा मार्ग, रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने उचगाव ते कागल रस्त्यावर अपघात वाढले आहेत. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. गेल्या वर्षांपासून गोकुळ शिरगाव व कागल एमआयडीसी परिसरात ट्रक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात ५५० उद्योग सुरू असून, त्यांच्या मालवाहतुकीसाठी अवजड वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
रस्त्यावर तीव्र वळणे, काही ठिकाणी अपूर्ण रस्ता आणि सूचना फलक नसल्याने अपघात घडत आहेत. काही लोकांचा जीवही गेला आहे. अपूर्ण कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. पेठनाका ते कागल कोगनोळीपर्यंत हायवेवर दिशादर्शक फलक काही ठिकाणीच आहेत, ते सर्वत्र लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच वाहनधारकांनी वेग मर्यादा पाळावी, तरच अपघातांना आळा बसेल, अशी अपेक्षा सामान्य लोक करत आहेत.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अपघातांना आमंत्रणच देत आहे की काय? असा प्रश्न जनतेतून विचारण्यात येत आहे.