तामगाव तलावात बुडणाऱ्या महिलांना सुरक्षा रक्षकाने वाचवले!

तामगाव (सलीम शेख) : तामगाव (ता. करवीर) येथील तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन महिला आणि दोन मुली पाण्यात बुडत असताना, संदीप धनवडे नावाच्या सुरक्षा रक्षकाने धाडस दाखवत या तिघी महिलांचा जीव वाचवला. ही घटना मंगळवारी (१८) दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ४०वर्षे, ३२वर्षे आणि १७ वर्षे वयाच्या तीन महिला आणि १० व १२ वर्षे वयाच्या दोन मुली दुपारी १२ वाजता तामगावच्या तलावावर कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. कपडे धुऊन वाळत घालण्याचे काम मुली करत होत्या. १७ वर्षीय मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तिची आई आणि बहीण पाण्यात उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघीही बुडू लागल्या. खडकावर बसलेल्या मुलींनी आरडाओरड केली. तेवढ्यात, मासेमारी करत असलेले संदीप धनवडे यांनी त्यांचा आवाज ऐकला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी मारली. बुडणाऱ्या महिलांना बाहेर काढताना एका महिलेने त्यांना घट्ट मिठी मारल्याने त्यांचा उजवा हात अडकला. त्यामुळे त्यांना पोहणे कठीण झाले. मात्र, त्यांनी हिंमत न हारता तिसऱ्या महिलेला पकडले आणि डाव्या हाताने त्यांना काठावर आणले. काठावर आल्यानंतर त्यांनी सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर महिला थरथर कापत होत्या. संदीप धनवडे यांचाही जीव धोक्यात आला होता. पण, त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे तिघी महिलांचे प्राण वाचले.
संदीप धनवडे हे गुरुमाऊली सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.