गडमुडशिंगीत भानामतीचा धक्कादायक प्रकार; माळी कुटुंब भयभीत!

गडमुडशिंगी (ता. करवीर)( सलीम शेख ) : गडमुडशिंगी येथे वसगडे शिवेवरील माळी मळ्यात भानामतीसदृश प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी माळी यांच्या घरासमोर विचित्र वस्तू ठेवल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेश अण्णासो माळी हे रविवारी (ता. ४) पहाटे देवदर्शनासाठी उठले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजासमोर संशयास्पद वस्तू दिसल्या. यामध्ये पाच बाहुल्या (तीन मोठ्या व दोन लहान), लिंबू (तीन धारी व चार साधे), चार शंख, दोन अंडी, काळा व रंगीत दोरा, मोहरीचे तेल, हळद, कुंकू आणि उलट्या पिळाचा पंचधातूचा मोळा यांचा समावेश होता. विशेष म्हणजे दोन बाहुल्यांना दोरीने गळा आवळलेल्या स्थितीत पाहून माळी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच, गस्तीवर असलेले गांधीनगर पोलीस तातडीने माळी मळ्यात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबाला धीर दिला. पोलिसांनी परिसराची पाहणी करून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी शुक्रवारी पहाटे नीता माळी यांनाही अशाच प्रकारच्या वस्तू घरासमोर आढळल्या होत्या. दोन दिवसांत दोन वेळा हा प्रकार घडल्याने माळी कुटुंबीय अधिकच धास्तावले आहेत. कुटुंबीयांनी स्वतःच या वस्तूंची विल्हेवाट लावली आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अशा अघोरी कृत्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या कृत्यामागील दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी माळी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा छडा लावावा, असे आवाहन केले.
या घटनेमुळे राजेश माळी, त्यांची पत्नी नीता माळी, वडील अण्णासो माळी, मुलगी संस्कृती माळी आणि मुलगा सोहम माळी हे मानसिक तणावाखाली आहेत. नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.
या संदर्भात बोलताना राजेश माळी म्हणाले, “आम्ही साधे शेतकरी आहोत. आमचे कोणाशीही वैर नाही. तरीही आमच्यासोबत असे प्रकार घडत आहेत. यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, ही आमची अपेक्षा आहे.”