जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने गोकुळ शिरगावात महाविकास आघाडीचा जल्लोष!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी जातनिहाय जनगणना मुख्य जनगणनेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे गोकुळ शिरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने साखर पेढे वाटून स्वागत करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना बबन शिंदे म्हणाले, “काँग्रेस पक्षासह इतर प्रादेशिक पक्षांनी जातनिहाय जनगणनेसाठी वारंवार आंदोलने केली. मात्र, केंद्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि इतर समविचारी पक्षांच्या दबावामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले.”
शिंदे यांनी पुढे बोलताना काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील गट नेते सतेज पाटील यांच्या निर्णयानुसार जनगणना प्रक्रियेत शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच, जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्ते सहकार्य करतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास गोकुळ शिरगावचे माजी सरपंच शंकरराव पाटील, के.डी. पाटील सर, सर्जेराव मिठारी, विकास पाटील, संतोष कागले, रावसाहेब मिठारी, अर्जुन चौगुले, पंडित चौगुले, शिवाजी मिठारी, कृष्णात गुरव , नजीर शेख,हारुण पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.