कागलमध्ये मान्सूनपूर्व कामांसाठी पालिका प्रशासन सज्ज; आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित!

कागल (सलीम शेख ) : आगामी पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कागल नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामांना गती दिली असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांनी जातीने लक्ष घालून विविध विभागांना कामांचे वाटप केले आहे.
शहरातील ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे आणि उकिरडे हटवण्यावर भर दिला जात आहे. तसेच, शहरातील गटार आणि नालेसफाईची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ही कामे प्राधान्याने केली जात आहेत.
वाहतुकीस अडथळा ठरणारे शहरातील सर्व होर्डिंग्ज काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटून घेण्याची कार्यवाहीही हाती घेण्यात आली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी धोकादायक इमारतींना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.प्रशासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत प्रभागनिहाय स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार नालेसफाई, कचरा उठाव, रस्ते सफाई आणि रस्त्यांवरील बांधकाम साहित्य हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी प्रशासन कटिबंध आहे.
मुख्याधिकारी अजय पाटणकर हे दर आठवड्याला विभागप्रमुखांची बैठक घेऊन नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा निपटारा होत आहे की नाही याचा आढावा घेत आहेत. कामांमध्ये दिरंगाई होणार नाही याची ते खात्री करत आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशीही मान्सूनपूर्व तयारीची यंत्रणा शहरात सज्ज ठेवण्यात आलेली आहे.
विभागांना जबाबदाऱ्या निश्चित:
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम आणि कर विभागासह इतर विभागांनाही विशिष्ट कामे नेमून दिली असून, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. आरोग्य विभागाचे प्रमुख नितीन कांबळे (आरोग्य निरीक्षक), दस्तगीर पखाली (आरोग्य निरीक्षक) आणि बादल कांबळे (स्वच्छता मुकादम) यांच्यावर शहरातील गटार स्वच्छता, नालेसफाई आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे.