कागलसाठी ६०० कोटींचा २ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल लवकरच!

कागल (सलीम शेख ) : कागल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आता लवकरच सुटणार आहे. शाहू साखर कारखान्याच्या ऑफीसपासून कागल चेकपोस्टपर्यंत तब्बल २ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात या उड्डाणपुलासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
हा उड्डाणपूल ५५ मीटरच्या अंतरावर ४० खांबांवर (पिलर) उभा राहील आणि त्याची रुंदी २५ मीटर असेल. कोल्हापूरच्या दिशेने चढ आणि बंगळुरूच्या दिशेने शेवटचा उतार अशा पद्धतीने त्याची रचना असेल. २००६ मध्ये महामार्गाचे चौपदरीकरण झाले असले तरी, कागलमध्ये अनेक त्रुटी राहिल्या होत्या, ज्यामुळे शहराचे पूर्व-पश्चिम विभाजन झाले आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः साखर कारखाने सुरू झाल्यानंतर होणारी वाहतूककोंडी ही एक मोठी समस्या बनली होती. यामुळे अनेक अपघात झाले, अनेकांनी आपले प्राण गमावले आणि कित्येक जण अपंग झाले.
कागलच्या जनतेने अनेक वर्षांपासून पिलरवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती आणि आता ती पूर्णत्वास येत आहे. कराड येथे उभारण्यात आलेल्या पिलरच्या उड्डाणपुलाप्रमाणेच कागल येथेही हा उड्डाणपूल उभारला जाईल. कोल्हापूर-बंगळूरू महामार्गावरील कागल शहर औद्योगिक आणि व्यापारी दृष्ट्या वेगाने विकसित होत आहे. मात्र, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आणि अनियमित रहदारीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असे. विशेषतः बस स्थानक परिसर आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते, ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
कागल येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे, जिथे हजारो कामगार रोजगारासाठी येतात. या औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी कामगारांना पूर्व बाजूकडून पश्चिम आणि पुन्हा पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे कसरत करत यावे लागत असे. उड्डाणपुल झाल्यामुळे हा त्रास वाचणार आहे.
कागल शहर, कसबा सांगाव, सुळकूड, मौजे सांगाव ही गावे, मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्टँड, शाळा हे पूर्व बाजूला आहेत, तर सर्व प्रशासकीय कार्यालये, खासगी रुग्णालये, साखर कारखाने आणि मुरगूड, आदमापूर, सिद्धनेली, राधानगरी या गावांना जाणारा मार्ग पश्चिम बाजूला आहे. यामुळे रस्ता ओलांडणे अवघड होत होते. छोटे भुयारी मार्ग वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत होते. आता हा मोठा पिलर पूल झाल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन कागलकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.