रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने ‘भारत जिंदाबाद’ यात्रेचा कोल्हापुरात समारोप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप २८ भारतीयांची हत्या करणाऱ्या पाकपुरस्कृत अतिरेकी संघटना आणि त्यांच्या नऊ अड्ड्यांवर अचूक हल्ला करणाऱ्या भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांनी घोषित केलेल्या ‘भारत जिंदाबाद’ यात्रेचा समारोप आज कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दसरा चौकातून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली. सीपीआर चौक, गंगाराम कांबळे स्मारक, महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भवानी मंडप मार्गे ऐतिहासिक बिंदू चौकात यात्रेचा समारोप करण्यात आला. बिंदू चौकात क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती स्तंभाला अभिवादन करून समारोप सभेला सुरुवात झाली.
या रॅलीचे संयोजक आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सभेला मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे म्हणाले की, “भारत देशावर वारंवार होणारे अतिरेकी हल्ले पाकिस्तान लष्कर पुरस्कृत आहेत. या अतिरेक्यांचा उपद्रव जगाची शांती बिघडवणारा आहे. या अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने अत्यंत कौतुकास्पद आणि प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावी अशी कामगिरी केली आहे. संपूर्ण लष्कराच्या या शौर्याला ताकद देणे गरजेचे आहे.”
महाराष्ट्र राज्य सचिव बी. के. कांबळे यांनी सांगितले की, “रिपब्लिकन पक्षाने नेहमीच राष्ट्रीय हिताची आणि अभिमानाची कामे केली आहेत. देशाच्या लष्कराने केलेल्या कामगिरीचे अभिनंदन करून कौतुक करण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी जाहीर केलेली ‘भारत जिंदाबाद’ यात्रा आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.”
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, कबीर नाईकनवरे, चरणदास कांबळे, किरण नामे, नामदेव कांबळे, कुंडलिक कांबळे आणि सलमान मौलवी यांची भाषणे झाली. जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांनी समारोप सभेचे आभार मानले.
या समारोप रॅलीमध्ये होलार आघाडीचे लक्ष्मण पारसे, शाम लाखे, ज्येष्ठ नेते राजू भडंगे, दिलीप कोथळीकर, सुरेश शिरोलीकर, सरदार कांबळे शाहूवाडीकर, सुनील कांबळे, सुहास हुपरीकर, शिरीष थोरात, खंडेराव कुरणे, रोहित कांबळे, तुषार नाईकनवरे, राहुल गलगले, गणेश भोसले, सागर भोसले, आकाश पवार, बाबासो कांबळे, संदीप कांबळे, सुरज तांमगावकर, अमोल गवळी, अनिल नलावडे, रवी शिवशरण, रुपेश आठवले, सरदार आमशीकर यांच्यासह ४०० ते ५०० रिपब्लिकन सैनिक सहभागी झाले होते. “नाद नाही करायचा… भारताचा…”, “पोक भारताच्या ताब्यात घ्यावा”, “भारत जिंदाबाद”, “भारतीय सैन्य दलाचा विजय असो”, “रिपब्लिकन पार्टीचा विजय असो”, “आठवले आगे बढो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.