महाराष्ट्र ग्रामीण

शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे: निपाणीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

निपाणी (सलीम शेख) : हिंदु हेल्पलाईनच्या वतीने निपाणी येथील ‘दि प्लस हॉल’मध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात शिक्षण आणि संस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. निपाणी आणि निपाणी तालुक्यातील ६० हून अधिक दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी इस्कॉन, पुणे (निगडी) येथील प.पू. राम गोविंद प्रभुजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी, प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा आणि निपाणी सर्कलचे पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि भगवद्गीता देऊन आशीर्वादरूपी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत मैदानी खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे. बुद्धीसोबत मन आणि मनगटही बलशाली झाले पाहिजे. शिक्षणात उत्तुंग यश मिळाल्यावर समाज आणि राष्ट्राप्रती आपली जबाबदारी वाढते. आपल्या प्रगतीसोबत समाज आणि राष्ट्राची प्रगती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. तसेच, तरुणांनी व्यसन आणि वाईट गोष्टींपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


प.पू. राम गोविंद प्रभुजी यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण अवस्थेत फक्त ज्ञानग्रहण करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियापासून शक्यतो दूर राहण्याचा सल्ला दिला. या वयात आपले सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती, भारतीय विचार, आचार तसेच संत-महंत आणि क्रांतिकारकांची चरित्रे वाचायला देऊन त्याप्रमाणे आचरण करायला शिकवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी सदगुरू सच्चिदानंद बाबांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे ते म्हणाले. शिक्षण घेताना कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि साधुसंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा संदेश प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी दिला.
प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी विद्यार्थ्यांना नेहमी आशावादी राहण्याचा सल्ला दिला आणि पालकांनी मुलांकडून जबरदस्तीची अपेक्षा करू नये असे सांगितले. पालकांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांशी आणि त्यांच्या मित्रांसोबत नेहमी संपर्कात राहावे आणि विद्यार्थ्यांना विज्ञानासोबतच अध्यात्माचेही महत्त्व समजावून सांगितले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हिंदु हेल्पलाईनचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की, निपाणीमधील साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु हेल्पलाईनच्या वतीने मागील वर्षापासून परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा साधू-संत-महंत यांच्या हस्ते आशीर्वादरूपी सत्कार करून गौरवण्यात येत आहे. यावेळी त्यांनी हिंदु हेल्पलाईनच्या वतीने निपाणी आणि परिसरात विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले.
यावेळी अँड. बेंद्रे मॅडम आणि सुचित्राताई कुलकर्णी यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरद सर यांनी केले, तर आभार सुनील जनवाडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इस्कॉन, सदगुरू सच्चिदानंद महाराज सेवा कमिटी, सधर्म चॅरिटेबल ट्रस्ट सेवा, हिंदु हेल्पलाईन निपाणी, गोरक्षण सेवा समिती निपाणी आणि सकल हिंदू समाज निपाणी यांचे कार्यकर्ते, भक्तमंडळी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button