महाराष्ट्र ग्रामीण

जमिनी खरेदीनंतर तलाठ्याकडील हेलपाट्यांना ‘ब्रेक’, ‘आय सरिता’ आणि ‘ई -फेरफार ‘ संगणक प्रणाली संलग्न!

धुंदवडे ( विलास पाटील ) : जमीन व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी ‘आय सरिता’ आणि ‘ई -फेरफार ‘ या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदवल्यानंतर अवघ्या वीस ते पंचवीस दिवसात सातबारा उताऱ्यावर संबंधित खरेदीदाराच्या नावाची फेरफार नोंद होणार असल्याने तलाठ्याकडील हेलपाट्यांना ब्रेक मिळणार आहे.

राज्यातील जमीन व्यवहारांमध्ये प्रचंड सुलभता आणणारा आणि नागरिकांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे वाचवणारा महत्त्वाचा निर्णय सरकारने अमं लात आणला आहे. दस्त नोंदणी नंतर ‘आय सरिता’ प्रणाली मधून मिळलेला मजकूर थेट महसूल विभागाच्या ‘ई फेरफार ‘या संगणक प्रणालीमध्ये पोहोचतो .यामुळे जमीन विकणारा आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तींची नावे ,क्षेत्रफळ ,बाजार मूल्य, व्यवहाराची तारीख इत्यादी माहिती स्पष्ट असते. ही माहिती मिळताच तलाठी संबंधित पक्षकरांना नोटीस पाठवतात आणि मंडल अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर ही नोंद सातबारा उताऱ्यावर आपोआप घेतली जाते. ‘ई फेरफार’ ,आय सरिता या दोन्ही प्रणाली एकमेकांशी संलग्न असल्यामुळे नागरिकांना तलाठी कार्याला फेरफारसाठी वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत .ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक बनल्यामुळे विनाकारण होणारा विलंब आणि आर्थिक मागणी याला आळा बसेल अशी अपेक्षा आहे .अनेकदा जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव येण्यासाठी दोन-तीन महिने लागत असत .अनेक वेळा ही प्रक्रिया वर्षभर ही प्रलंबित राहत असे. मात्र आता केवळ २०ते २५ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने नागरिकाभिमुख तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल व्यवहारांमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याचा केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय आहे. भविष्यात यातील कार्यक्षमतेला अधिक बळ देण्यासाठी लोकसहभाग आणि जागरूकता महत्त्वाची ठरणार आहे.
दशरथ पाटील (उपसरपंच शेळोशी )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button